भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) येणाऱ्या पर्यटकांना आता वाघांचं दर्शन घडणार आहे. औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानातून करिष्मा (मादी) आणि शक्ती (नर) हे दोन पट्टेरी वाघ इथं आणण्यात आले आहेत. लवकरच हे वाघ पर्यटकांना जवळून पाहता येणार आहेत. दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर त्यांना भायखाळातल्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आलं.
पेंग्विन आणि विविधरंगी पक्षी तसेच नवनवीन प्राण्यांची गजबजाट असणाऱ्या राणीच्या बागेत तब्बल १४ वर्षांनी वाघोबाची डरकाळी कानी पडणार आहे. दोन वाघांची जोडी बुधवारी जिजामाता उद्यानात दाखल झाली. शक्ती हा चार वर्षांचा तर करिष्मा ही सहा वर्षांची आहे.
वाघांच्या या जोडीच्या बदल्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातून दोन जोडी ‘चितळ’ आणि दोन जोड्या ‘चित्रबलाक’ (रंगीत करकोचा) सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले आहेत. औरंगाबाद इथून आणण्यात आलेल्या करिष्मा आणि शक्ती या वाघांना प्राणिसंग्रहालयाच्या क्वारंटाइन सुविधेमध्ये ठेवण्यात आलं आहे. लवकरच या वाघांना जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळेल.
राणीच्या बागेत २००६ पूर्वी पट्टेरी वाघाची जोडी होती. त्यापैकी मादी २००४ मध्ये तर नर २००६ मध्ये मरण पावला. त्याच सुमारास एका स्वयंसेवी संस्थेनं राणीच्या बागेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास केले जात नाहीत तोपर्यंत उद्यानात प्राणी ठेवण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश न्यायालयानं दिले होते. पण पुन्हा राणी बागेत वाघ पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा