Advertisement

कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई
SHARES

कर्तव्यावर असताना मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू असणार आहे.

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या योजनेची घोषणा केली आहे. कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा विमा लागू होईल. दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमा उतरवणारी ही देशातली पहिली महापालिका असल्याचा मुंबई महापालिकेचा दावा आहे.

कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेतील विविध प्रवर्गातील कामगार/कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी/तदर्थ/मानसेवी कर्मचारी यांचा कोविड १९ संबंधित कर्तव्य बजावताना, कोविड १९ मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य लागू असेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड १९ शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे असे कर्मचारी वगळून इतरांसाठी हे सानुग्रह सहाय्य योजना लागू असेल.

सानुग्रह सहाय्यासाठी निकष देखील निश्चित करण्यात आले आहेत. सदर कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी  14 दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असणे आवश्यक असेल. ज्या प्रकरणांमध्ये कोविडची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेची सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करुन अंतिम निर्णय घेईल.

संबंधित कामगार, कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या वारसांना विविध दस्ताऐवजांसह अर्ज करावा लागेल. अर्जासोबत मृत कामगार, कर्मचारी यांचे ओळखपत्र, दावा कर्त्याचा ओळख पुरावा, मृत व दावाकर्ता यांच्यातील नातेसंबंधांचा पुरावा यांची प्रमाणित प्रत, कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा प्रयोगशाळेचा अहवालाची प्रमाणित प्रत, चाचणी झाली नसल्यास किंवा चाचणी चुकीचा निगेटिव्ह असल्याची शक्यता असल्यास त्या प्रकरणणंमध्ये अधिष्ठाता समितीचा अहवाल, संबंधित रुग्णालयाचा मृत सारांश, मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत आदी सादर करावे लागतील. कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे, रोजंदारी, तदर्थ, मानसेवी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी, कामगार यांच्या प्रकरणांमध्ये संबंधित खाते प्रमुखाचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. सामाजिक संस्था/ठेकेदार यांच्यामार्फत नियुक्ती झाली असल्यास त्या कामाच्या अनुषंगाने महापालिकेकडे जमा केलेली वर्कमॅन कॉम्पेनसेशन पॉलिसी, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, ईएसआय योजना आदींची प्रमाणित प्रत द्यावी लागेल.

दावेदाराने अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रं संबंधित खात्याकडे सादर केल्यानंतर या अर्जाची पडताळणी करण्यात येईल. संबंधित खात्याने दावा तयार करुन तो प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाईल.



हेही वाचा -

ठाणे जिल्ह्यात 5137 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्यातील 'अशी' आहे रुग्णांची सद्यस्थिती

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा