छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकानजीक असलेल्या हिमालय पुलाचा भाग काही दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यात ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याप्रकरणी आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हिमालय पूल दुर्घनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशांमार्फत या घटनेची चौकशी करण्यात यावी, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
महापालिका या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राजा यांनी आपल्या पत्रातून केला आहे. तसंच पालिकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. परंतु त्याबाबत अद्यापही कठोर कारवाई करण्यात आली नसून दोषी अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा -
ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील पाण्याच्या टाकीत ५ कामगार पडले, एकाचा मृत्यू
नायगाव बीडीडीत स्लॅब कोसळून महिला जखमी