अंतिम वर्षातील (final year exam) विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावरून सुरू असलेल्या गोंधळात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (maharashtra minister for higher and technical education uday samant) यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना (students) केंद्रबिंदू मानून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असं सामंत यांनी सांगितलं.
२ दिवसांत अहवाल
सामंत म्हणाले, अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (meeting with bhagat singh koshyari) यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानुसार राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल आणि शासनास सादर करावा, अशा सूचना आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- वैद्यकीय पदव्युत्तर ऑनलाइन प्रवेशनिश्चिती प्रक्रिया सुरू
गुणवत्ता कायम ठेवणार
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचं की कसं, यावरही चर्चा करण्यात आली. हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत असाच निर्णय घेण्यात येईल. त्याच बरोबर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावरही याचा काही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा पूर्णपणे विचार करून वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवत विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं.
महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालये, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे क्वारंटाईनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणं कितपत शक्य होईल, यावर चर्चा झाली.
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ.अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.
हेही वाचा- अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांना येत्या ६ दिवसांत मिळणार शिष्यवृत्ती