Advertisement

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार कडक निर्बंध राज्यभरात लागू करण्यात आले असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना वाढतोच आहे. त्यामुळं नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.

गेल्या वेळी आपण करोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. मात्र, आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटलं.

राज्य शासनानं दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संक्रमित झाली आहे. प्राणवायू उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ कृती दलाकडून समजून घ्यावे.

प्राणवायूचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटलं.

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनानं बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचं लक्षात आलं आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असे ठाकरे यांनी सांगितले.



हेही वाचा - 

सचिन वाझे आणखी दोघांची हत्या करणार होते, तपास यंत्रणांना संशय

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा