'उठा उठा दिवाळी आली' हे वाक्य आता सर्वांच्या कानात घुमू लागलं असून जिकडेतिकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातही दिवाळी म्हणजे नवीन कपडे, फटाके आणि मनसोक्त फराळ. पण तयार फराळ, मिठाई आणि फराळ तयार करण्यासाठीचा कच्चा माल खरेदी करताना जरा सावधान!, असं म्हणण्याचीही वेळ आली आहे. कारण दरवर्षीप्रमाणे दिवाळीत भेसळखोर सक्रीय झाले आहेत.
मुंबईतील विविध ठिकाणी भेसळयुक्त खाद्यपदार्थ, मिठाई आणि खवा बाजारात विक्रीसाठी आल्याची बाब अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) च्या कारवाईतून समोर आली आहे. दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील धारावी, कुर्ला आणि बोरिवली इथं धाडी टाकत ३ लाखाचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त केल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.
जप्त करण्यात आलेल्या अन्न पदार्थमध्ये खाद्यतेल, खवा बर्फी, फरसाण आणि शेव या पदार्थांचा समावेश आहे. या अन्न पदार्थांचे १२ नुमने तपासणी साठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहितीही दराडे यांनी दिली आहे.
दिवाळीत मिठाई, खाद्यतेल, रवा, बेसन, डाळी, खवा, मावा यांची मागणी वाढते. या मागणीचा फायदा भेसळखोर घेतात. त्यामुळे दरवर्षी भेसळयुक्त फराळ, अन्न पदार्थ, मिठाई आणि खवा- मावा बाजारात येतो. तर दरवर्षी एफडीए कडून या काळात विशेष मोहीम राबवत भेसळखोरांवर नजर ठेवते. त्यानुसार यंदाही एफडीएकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाने १९ आणि २० आॅक्टोबर या २ दिवसांत धारावी, कुर्ला, बोरिवली इथं धाडी टाकत ३ लाखाचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त केले आहेत.
बोरिवली पूर्व इथून १,२२,७८० रुपये किमतीचं खाद्यतेल अप्रामाणित असल्याच्या संशयावरून जप्त केलं आहे. तर या खाद्यतेलाचे ३ नमुने ताब्यात घेतले आहेत. तर बोरीवली पश्चिम इथून ६, २४० रुपये किमतीची मलई पनीर, दूध आणि खवा जप्त केला असून याचेही ३ नमुने ताब्यात घेतले आहेत. मस्जिद बंदर इथं धाड टाकत एफडीएने १,३१,२९५ रुपये किंमतीच खाद्यतेल जप्त करत त्याचे ३ नुमने तपासणीसाठी घेतले आहेत. कुर्ला इथून १६, ३३६ रुपये किमतीची स्पेशल बर्फी आणि मावा जप्त करत याचे २ नमुने देखील घेतले आहेत. तर धारावीतून २६, ७५० रुपये किमतीचा शेव आणि फरसाण जप्त करत याचा एक नुमना ताब्यात घेतला आहे.
एकूण १२ नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून याचा अहवाल आल्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान ऐन दिवाळीच्या तोंडावर ही कारवाई झाल्यानं मुंबईकरांची चिंता नक्कीच वाढणार आहे. तेव्हा मुंबईकरांनो दिवाळीचे फराळ, मिठाई आणि अन्न पदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घ्या, असं आवाहन दराडे यांनी केलं आहे. तर काहीही संशयास्पद वाटल्यास १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधा, असंही आवाहन त्यानी केलं आहे.
हेही वाचा -
गंभीर! डेअरीमध्येच होतेय दूधभेसळ
मुंबईकरांनो सावधान! दुधभेसळखोरांचा सुळसुळाट; दुसऱ्या रॅकेटचा पर्दाफाश