मुंबई शहर जिल्हयात ३० मुंबई दक्षिण-मध्य व ३१ मुंबई दक्षिण या २ लोकसभा मतदार संघाचा समावेश असून या दोन्हीही मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २ एप्रिलपासून सुरूवात होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ९ एप्रिल असून उमेदवारी अर्जाची छाननी ही १० एप्रिल रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १२ एप्रिल आहे. मुंबई शहर जिल्ह्यासाठी ५२७ ठिकाणी २ हजार ६०१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून धारावीसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एका शाळेत जास्तीत जास्त ५८ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आल्याचं जोंधळे यांनी सांगितलं.
जिल्हयात एकूण १८२ मतदान केंद्र हे तात्पुरत्या स्वरुपात मंडपामध्ये उभारण्यात आले आहेत. तसंच कुठलाही दिव्यांग मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रावर आणणं व त्याच्या घरी सोडणं, तसंच मतदान केंद्रावर रॅम्पची, व्हिल चेअरची व्यवस्था अनिवार्य करण्यात आलं आहे. मतदान केंद्रावर एकूण १५ प्रकारच्या सेवासुविधा निवडणूक विभागातर्फे मतदारांना देण्यात येणार असून जी महिला आपल्या लहान बालकांना मतदान केंद्रावर घेऊन येईल या लहान बालकांसाठी खेळण्याचे साहित्य असलेली विशेष खोली आणि त्यांना सांभाळण्यासाठी आयांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
मतदारांनी आपले मत ज्या कुठल्या उमेदवाराला दिले आहे त्या उमेदवाराचं नाव, त्याचा पक्ष तसंच त्याचं चिन्ह ७ सेकंदापर्यंत VVPAT (व्हीव्हीपॅट) मशीनच्या स्क्रीनवर फक्त मतदान करणाऱ्या मतदाराला बघता येण्याची सुविधा यावेळी प्रथमच करण्यात आली आहे. उमेदवाराला विविध परवानगी प्राप्त करण्यासाठी एक खिडकी योजना असलेले ‘सुविधा’ ही ॲप प्रणाली उमेदवारांच्या वाहन परवान्यासाठी ‘सुगम’ हे ॲप तर नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारीचं उत्तर देण्यासाठी ‘समाधान’ ही ॲप प्रणाली सुरु केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
झवेरी बाजार भागात आयकर विभागाने ६ कोटी २० लाख रुपयांच्या अनधिकृत व्यवहारावर कारवाई केल्याचं जोंधळे म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी एन.एस.एस व स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ३० मार्चपर्यंत ५६ हजार ८२८ नव मतदारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून या नव मतदारांचा समावेश मतदार म्हणून या निवडणुकीत करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
निवडणूक कालावधीत माध्यम कक्षही उभारण्यात आले आहेत. तसंच कक्षात मीडिया मॉनिटरिंगची सर्व सुविधा असून त्याकरीता आवश्यक ते टी.व्ही. संच बसविण्यात आले आहेत. विविध भाषिक चॅनलव्दारे प्रसारित होणाऱ्या जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या बातम्यांचं अवलोकन करणं, तसंच कार्यकक्षेतील संबंधित बातमी, त्याची नोंद घेऊन वरिष्ठांना अवगत करणं, त्याचप्राणे दैनंदिन विविध भाषिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचं कात्रण फाईल तयार करणं व आक्षेपार्ह बातमीबाबत कार्यवाही करण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा
उर्मिलाने चालवली रिक्षा, गोराईतील रिक्षा चालकांना केलं खूश