देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला पुन्हा एकदा आग लागण्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी संध्याकाळी आग लागण्याची घटना घडली असून दोन वर्षांनंतर पुन्हा या आगीच्या धुराच्या लोटांमुळे डम्पिंग ग्राऊंड प्रकरण तापण्याची शक्यता आहे. कचऱ्याच्या तसेच देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्दयावर सकारात्मक निर्णय होत असतानाच ही आग लागली की लावली गेली? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये मार्च २०१६मध्ये आग लागण्याचे प्रकार सुरु होते. त्यामुळे या डम्पिंग ग्राऊंडवरील अग्निसुरक्षा तसेच कचरा माफियांना रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी भंगार व्यावसायिकांकडून लावल्या जाणाऱ्या आगींच्या पार्श्वभूमीवर कचरा वेचकांसह कुणालाही आत अनधिकृत प्रवेश दिला जाऊ नये, म्हणून संरक्षक भिंतींचे काम करण्यात आले आहे. तसेच, यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, टेहळणी टॉवर उभारण्यात आला. याशिवाय आगीची दुघर्टना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन आणि एक टँकर यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र, तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील आगीने पेट घेत धुराचे लोळ हवेत पसरले आहेत. या धुरामुळे आसपासच्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याची भीती लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मार्च २०१६मध्ये तब्बल १२ दिवस आग धुमसत होती. ही आग विझवण्यासाठी दहा टँकरच्या मदतीने अविरत प्रयत्न सुरु होते. तुर्भे आणि घाटकोपर येथील जलाशयांमधून बारा दिवस या दहा टँकरच्या मदतीने २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल १७ लाख २८ हजार रुपये खर्च करण्यात आले. मार्च २०१६ला टँकरच्या पाण्यावर केलेल्या या खर्चाला तब्बल दोन वर्षांनी मान्यता घेण्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढेही आला आहे. दोन वर्षांनी हा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे असतानाच त्याचवेळी पुन्हा आगीची दुघर्टना घडणे हा योगायोग घडून आला की घडवून आणला? असा शंकावजा सवाल आता केला जात आहे.
हेही वाचा
सचिन तेंडुलकर देवनार, शिवाजी नगरचा 'स्वच्छतादूत'