Advertisement

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; अतिवृष्टीचा धोका

मुंबईत मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; अतिवृष्टीचा धोका
SHARES

मुंबईत मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसानं (mumbai rains) हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं (imd) काही दिवसांपूर्वीच दिली होती. दरम्यान सकाळच्या सुमारास पाऊस पडत असल्यामुळं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यांत बुधवार ते शनिवार या ४ दिवसांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने राज्य सरकारला दिला आहे. काही ठिकाणी दिवसभरात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने राज्य सरकारने (maharashtra) सर्व जिल्हाधिकारी व प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि सखल भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवण्याचे व करोना रुग्णालयांची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले आहेत.

किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका आहे. ९ ते १२ जून या ४ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह मुंबई व कोकणातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षक दल, नौदलाला तयार राहण्याची सूचना द्यावी. 

किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन संभाव्य मदत कार्याची रूपरेखा निश्चित करावी. दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव शासनाकडे आले असून, त्यांना तातडीने मंजुरी द्यावी. या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांचे प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

अतिवृष्टीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टी घडणे अपेक्षित असते तर काही गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात. आपण अपेक्षित गोष्टी गृहीत धरून तयारी करतो. अनपेक्षित संकटाला तोंड देण्याचीही तयारी करावी. या ४ दिवसांत मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, गटाराची झाकणे उघडी राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अतिवृष्टी झाल्यास वीजपुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन  रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. जनित्रे, डिझेलचा साठा, प्राणवायूचा साठा करून ठेवावा. विजेच्या पुरवठय़ाची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अतिवृष्टीमुळे करोना केंद्रांमधील रुग्णांना अडचण होणार नाही. त्या केंद्रांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणाऱ्या स्थळांचा शोध घ्यावा, उपसाकेंद्र आणि झडपा यांची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरू आहे याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले असून याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनीअर नेमून दिलेल्या ठिकाणांवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठय़ा टाक्या केल्या असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. प्रत्येक वॉर्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल असे सांगितले. एनजीओच्या मदतीने स्थलांतरित लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहितीही त्यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने ११ व १२ जून रोजी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १० जून रोजी मुसळधार, तर पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एनडीआरएफ-एसडीआरएफ तैनात 

अतिवृष्टीच्या काळात आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)  तुकडय़ा तैनात कराव्यात. ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.



हेही वाचा - 

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

लोअर परेल परिसरातील १५ झाडांवर कुऱ्हाड, अज्ञातांविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा