पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणं आता काही नवीन नाही. दरवर्षी आपल्याला सारखं चित्र पाहायला मिळतं. पण तुम्हाला हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, गेल्या दहा वर्षांमध्ये मुंबईला पावसामुळे १४ हजार कोटींचं नुकसान झालं आहे.
युनायटेड स्टेटस ट्रेंड अँड डेव्हलपमेंट एजन्सीनं यासंदर्भात परिक्षण केलं. परिक्षणातून आलेल्या अहवालात २००५ ते २०१५ या दहा वर्षांत पावसाळ्या दरम्यान मुंबईत तुंबलेल्या पाण्यामुळे १४ हजार कोटींचा फटका बसल्याचं समोर आलं. युनायटेड स्टेटस ट्रेंड अँड डेव्हलपमेंट एजन्सीनं हा अहवाल राज्य सरकारला सोपवला आहे.
व्यापारी हब म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. मुंबईत मोठ -मोठ्या कंपनींची कार्यालयं आहेत. इथून मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. मात्र पावसाचं पाणी साचलं की मुंबई ठप्प होते. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडते. या कारणास्तव मुंबईकर कामावर जाऊ शकत नाहीत. अर्थात यामुळे कित्येक कार्यालये बंद असतात. उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्यानं आर्थिक राजधानीला कोट्यवधीचं नुकसान सहन करावं लागतं.
मुंबईची तुंबई झाल्यानं फक्त आर्थिक नुकसान नाही तर जिवीतहानी देखील झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये जवळपास ३००० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय १ लाख ५० हजार नागरिक आजारी पडल्याचं देखील अहवालात नमूद केलं आहे. २६ जुलै २००५ आलेल्या महापुरातील मृतांचा आकडा देखील यात समावेश आहे. २६ जुलै २००५ साली २४ तासांत ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. शतकातील सर्वात मोठा पाऊस २६ जुलै २००५ साली पडला होता.
अहवालात पायाभूत सोयी-सुविधांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या मुळावर उठून पायाभुत सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत. मुंबईची तुंबई होण्यामागे हे देखील एक कारण असल्याचं यात नमूद केलं आहे.
मेट्रो ३च्या कारशेडसाठी नुकतेच आरेतील २ हजार ७०० झाडं तोडण्याची परवानगी पालिकेच्या वृक्षतोड विभागानं दिली. या निर्णयाचा पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. आरेतील झाडं तोडली तर मुंबईत मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो.
हेही वाचा