मुंबईच्या कमला मिल कंपाऊंडमध्ये गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उडालेल्या अग्निकल्लोळाने १४ जणांचा जीव घेतला. ही आग कशामुळे लागली? या सर्व प्रकरणामध्ये कोण दोषी होतं? दोषींना शिक्षा होणार की नाही? अशा प्रश्नांची उत्तरं यथावकाश मिळतीलच. पण, या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मात्र सध्या एकच प्रश्न पडला आहे. असं का झालं? असाच प्रश्न पडला आहे गुजरातहून मुंबईत खास थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी आलेल्या यशा ठक्करच्या कुटुंबियांना.
२२ वर्षांची यशा गुरुवारीच म्हणजेच आग लागली त्याच दिवशी मुंबईत आली होती. यंदा पहिल्यांदाच यशा मुंबईमध्ये थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करणार होती. त्यामुळे ती खूप उत्सुक होती. तिची चुलत बहीण आणि चुलत भावासोबत ती गुरुवारी कमला मिलमधल्या मोजो बिस्त्रो रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आली होती. सारंकाही तिच्या इच्छेप्रमाणे होत होतं. पण तिच्या आनंदाला गालबोट लागलं, आणि डोळ्यांसमोर अवघ्या काही क्षणांमध्ये आगीचा भडका उडाला.
आपल्या भावंडांसोबत यशा वेळ घालवत असतानाच काही कळायच्या आत आचानक आरडाओरडा सुरु झाला. चहूबाजूंनी आग पेटली. आणि बघता बघता आख्ख्या हॉटेलमध्ये पसरली. यशाच्या चुलत बहिणीने प्रसंगावधान दाखवत थेट बाथरूम गाठलं आणि स्वत:ला कोंडून घेतलं. पण दुर्दैवानं यशाला हे करण्यासाठी वेळच मिळू शकला नाही. आगीचा भडका इतका होता, की यशाला काही कळायच्या आत ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे यशाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी लागलीच मुंबई गाठली. पण त्यांना पोहोचायला उशीर झाला होता. यशाचा दुर्दैवी अंत झाला होता.
हेही वाचा