मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून आंदोलन मोर्चे काढण्यात आले आहेत. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यात येणार आहे. मराठी एकीकरण समितीनं मराठीप्रेमी नागरिकांना हे पत्र लिहिण्यासाठी आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणाऱ्या पत्राचा मथळा एकीकरण समितीनं तयार केला आहे. त्यामुळं केवळ प्रत्येकाला
आपलं नाव नोंदवून पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचं आहे. त्याशिवाय, मराठीविषयक संस्था, संघटनांनाही अशा प्रकारे
आवाहन करून जास्तीतजास्त लोकांनी यासाठी आग्रही भूमिका घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
'२०१२ पासून महाराष्ट्र राज्य मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करीत आहे. महाराष्ट्र सरकारनं २०१३ मध्ये केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडं अहवाल पाठविला होता. तो त्यांनी साहित्य अकादमीकडं निर्णयासाठी पाठविला होता. २०१४ मध्ये साहित्य अकादमीनं मान्य करूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतची परवानगी केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेली नाही. या विषयात वैयक्तिक लक्ष घालून १२ कोटी लोकांची मातृभाषा व अंदाजे २ हजार वर्षांपूर्वीच्या स्वयंभू मराठीभाषेला तातडीनं अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा करण्यात यावी’, असं या मथळ्यात लिहिलं आहे.
हेही वाचा -
शरीरसौष्ठव सुहास खामकरच्या नावाने बनावट फेसबुक खातं, मुलींशी अश्लील संवाद
२८८ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार- आंबेडकर