कोरोना व्हायरसचं संकट आता अधिक वाढल्याचं दिसून येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा शनिवारी थेट 11 ने वाढला आहे. कोरोना रूग्णांची संख्या आता 63 झाली आहे. शुक्रवारपर्यंत रूग्णांची संख्या 52 होती. कोरोना व्हायरसचे मुंबईत 10 तर पुण्यात 1 नवीन रुग्ण आढळला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, नवीन ११ रुग्णांपैकी 8 जण विदेशातून आले होते. तर, तिघांना संसर्गातून लागण झाली आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र, परिस्थिती अशी कायम राहिल्यास चिंता वाढू शकते.
जनतेनं खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. घरातील, ऑफिसमधील एसी बंद ठेवा. लोकलचा वापर टाळा. रेल्वे स्थानकांतील गर्दी कमी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.