संचारबंदीच्या काळात देखील होत असलेल्या गर्दीला आवर घालण्यासाठी अखेर राज्य सरकारने नियमावलीत बदल करत किराणा आणि भाजीपाला खरेदी/विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ अशी वेळ निश्चित केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर भाजपकडून (bjp) पुन्हा एकदा जोरदार टीका करण्यात येत आहे.
सोमवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये विनाकारण घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील दुकानांच्या वेळा ठरवण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर न ठेवता राज्य सरकारच्या गाइडलाईनमध्येच बदल करण्यात यावा आणि राज्यातील किराणाची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच खुली ठेवण्यात यावीत, अशी भूमिका अजित पवार (ajit pawar) यांनी मांडली होती.
त्यानुसार राज्य सरकारने नव्या निर्बंधांबाबत आदेश काढून त्यामध्ये किराणा सामानासहीत इतर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांच्या वेळा निश्चित केल्या आहेत.
हेही वाचा- महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन हवाच- छगन भुजबळ
🚨🚨
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2021
Some new additions to the guidelines. Please do read and share.#BreakTheChain pic.twitter.com/OUJt8MXOpp
सरकारचे नवे निर्बंध पुढीलप्रमाणे:
१. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकरची अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मच्छी-मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, ताडपत्री इ.) विकणारी दुकाने यांना सकाळी ७ ते ११ या वेळेतच खरेदी/विक्रीला परवानगी असेल.
२. वरील सर्व दुकानांमधून होम डिलिव्हरी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार असतील.
३. स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापनाला कोणत्याही सेवेचा किंवा सुविधेचा समावेश अत्यावश्यक सेवा किंवा सुविधेमध्ये करायचा असल्यास त्यासाठी राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापनाची परवानगी घेणं बंधनकारक असेल.
४. वर उल्लेख केलेल्या नव्या बदलांशिवाय इतर सर्व निर्बंध हे १३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांनुसारच असतील.
मात्र राज्य सरकारच्या या निर्बंधांवर भाजपने टीका केली आहे. ४ तासांचे निर्बंध घातल्यामुळे आता या ४ तासांमध्येच मोठी गर्दी होईल. या गर्दीचं काही नियोजन सरकारने केलं आहे का?, असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
(maharashtra government issues new rules for grocery and vegetables shop during lockdown)