मेट्रो सिटीकडे वाटचाल करत असलेल्या मुंबईतील रहिवाशांना पुरेशी शौचालये नाहीत, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळेच नाईलाजाने अनेकांना 'आपत्कालीन' परिस्थितीत रेल्वे रुळांकडे धाव घ्यावी लागते.
पण काहीवेळेस ही धाव अनेकांसाठी धोकादायकही ठरू शकते. अशीच एक घटना नुकतीच कुर्ला येथे घडली असून रेल्वे रुळांवर शौचाला जाणाऱ्या वृद्धाचा जीव जाता जाता वाचला आहे.
त्याचे झाले असे की, कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ राहणाऱ्या एका नातेवाईकाचे निधन झाल्याने रत्नागिरीतील एक 65 वर्षांचे वयोवृद्ध अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आले होते. अचानक 'निसर्गाची हाक' आल्याने त्यांनी रेल्वे रुळांकडे धाव घेतली.
योग्य जागेच्या शोधात ते एक नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात त्यांचा पाय नाल्यावर बसवलेल्या जाळीत अडकला. बरेच प्रयत्न करूनही त्यांचा जाळीत अडकलेला पाय निघतच नव्हता.
एका बाजूला त्यांच्यावरील 'दबाव' वाढत होता. तर दुसऱ्या बाजूला पाय अडकल्याने त्यांना जागचे हलताही येत नव्हते. तेव्हा नाईलाजाईने त्यांनी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. रात्री उशीरा आजूबाजूचे रहिवासी जागे नसले, तरी त्यांचा आवाज ऐकला तो रेल्वे रुळांवर पेट्रोलिंग करत असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल्सनी.
या कॉन्स्टेबल्सनी आजूबाजूच्या रहिवाशांना गाेळा करत एका लोखंड कापणाऱ्याला बोलावले. साधारणत: तासाभराच्या मेहनतीनंतर अखेर या वयोवृद्धाचा पाय जाळीतून बाहेर काढण्यात आला. पाय जाळीत अडकल्याने त्यांच्या पायाला जखम झाली होती. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
जाता जाता पुन्हा या रेल्वे रुळांवर येणार नाही, असेही हे वयोवृद्ध सांगून गेले.
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)