मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाने एकत्रित येत सरकारविरोधी आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप मराठी क्रांती मोर्चाकडून करण्यात आला.
सरकारविरोधी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाने ६ मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका बैठकीचं आयोजन केलं आहे. सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाची ही बैठक पार पडेल. गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर सरकारने सर्व शासकीय विभागांना मराठा आरक्षणातून नियुक्ती न देण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप संघटनेतील एका समन्वयकाने बोलताना केला. तसेच सरकारने दिलेला हा छुपा आदेश असून याद्वारे त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणादरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आले नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आलं. तसंच आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्याही कुटुबीयांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचे सांगत मराठा समाजाने सरकारविरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन केल्याचं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
गिरगाव आणि जुहू चौपाटीला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा
उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी मोनोच्या सेवेत विघ्न