Advertisement

'मोतीलाल नगरचा पुनर्विकास स्थानिकांना विश्वासात घेऊनच करा' - शालिनी ठाकरे

वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह खुशवा यांची मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मनसेच्या सरचीटणीस शालिनी ठाकरे यांनी मंगळवारी भेट घेतली.

'मोतीलाल नगरचा पुनर्विकास स्थानिकांना विश्वासात घेऊनच करा' - शालिनी ठाकरे
SHARES

गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या पुर्नविकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुनर्विकास प्रकल्पामुळं बेघर झालेल्या कुटुंबांची अवस्था, त्यांना वेळेवर न मिळणारे भाडं, म्हाडाकडून नेमण्यात आलेल्या खासगी विकासकांकडून होणारी फसवणूक यांसारख्या अनुभवांमुळं मोतीलाल नगरमधील रहिवाशांच्या मनात पुनर्विकासाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'जोपर्यंत या रहिवाशांना त्यांची घरं आणि थकीत भाडं मिळत नाही, तोपर्यंत ते पुनर्विकासाला तयार होणार नाही. रहिवाशांच्या भावना आणि अपेक्षा लक्षात न घेताच म्हाडानं येथील पुनर्विकासाचा आराखडा तयार केला असेल, तर म्हाडाच्या या मनमानी कारभाराचा रहिवाशांकडून विरोध केला जाईल' असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.


पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा 

वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह खुशवा यांची मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मनसेच्या सरचीटणीस शालिनी ठाकरे यांनी मंगळवारी भेट घेतली. त्यावेळी मोतीलालनगरचा पुनर्विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुनर्विकास करा, अशी मागणी त्यांनी केली.


आराखडा तयार

'मोतीलालनगरच्या पुनर्विकासाचा आराखडा म्हाडातर्फे तयार करण्यात आला असला, तरी येथील स्थानिक रहिवाशांमध्ये त्याबाबत असंतोष आहे. म्हणून सर्वात आधी म्हाडानं मोतीलालनगराच्या आसपासच्या परिसरातील पुनर्विकास प्रकल्प, मग ते म्हाडाचे असोत किंवा खासगी विकासकांचे, लवकरात लवकर पूर्ण करावे. हे पूर्ण झाल्याशिवाय मोतीलालनगरमधील रहिवाशांचा पुनर्विकास प्रकल्पावर विश्वास बसणार नाही’, असं देखील शालिनी ठाकरे यांनी सांगितलं.


२ हजार चौरस फूट

मोतीलालनगरमधील रहिवाशांची विद्यमान घरे ही १ हजार १०० ते २ हजार चौरस फुटांची आहेत. त्यामुळं येथील भूखंडावर मिळणारा चारचा एफएसआय लक्षात घेता, रहिवाशांना प्रत्येक घरामागे २ हजार चौरस फूट कार्पेट एरिया मिळावा, अशी मागणी देखील मनसेच्या शिष्टमंडळानं खुशवा यांच्याकडं केली. शिष्टमंडळात मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव आणि मनसेचे पदाधिकारी सहभागी होते.


जुनी वसाहत

मोतीलाल नगर ही वसाहत सिद्धार्थ नगर वसाहतीप्रमाणंच ५० वर्षांहून अधिक काळ जुनी वसाहत आहे. पुनर्विकासाबाबत जो अनुभव सिद्धार्थ नगरच्या रहिवाशांना आला, त्यांना जो मनस्ताप झाला, त्या प्रकारचा अनुभव मोतीलाल नगरमधील रहिवाशांना येऊ नये, त्यासाठी म्हाडानं काळजीपूर्वक पावलं उचलायला हवीत. रहिवाशांना विश्वासात न घेताच जर मोतीलाल नगर क्र. , २ आणि ३च्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला तसंच, त्यांची जबरदस्तीनं अंमलबजावणी केली जाणार असेल, तर संघर्ष अटळ आहे. असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी यावेळी दिला.


पुनर्विकास म्हाडाच करणार

'गोरेगावातील इतर पुनर्विकास प्रकल्पांप्रमाणेच मोतीलाल नगरच्या पुनर्विकासात कोणत्याही खासगी विकासाचा सहभाग असणार नाही. मोतीलाल नगरचा पुनर्विकास म्हाडा स्वत:च करणार असून, लवकरच या पुनर्विकासासंबंधीचं सविस्तर असं सादरीकरण आम्ही रहिवाशांसमोर करणार आहोत. हा पुनर्विकास प्रकल्प खूप मोठा असल्यामुळे रहिवाशांचे ते जिथे राहतात, तिथेच पुनर्वसन करणं शक्य नाही', असं मनसेच्या शिष्टमंडळाला  उत्तर देताना म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह खुशवा यांनी सांगितलं.



हेही वाचा -

जोगेश्वरीमध्ये सिलेंडरचा स्फोट, १३ जण गंभीर जखमी

Exclusive वृद्धाची गाडीत गळा आवळून हत्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा