मुंबईत गुरुवारी संध्याकाळी पावसाने अचानक दमदार एन्ट्री घेतली. पावसाच्या जोडीला विजांचा कडकडाट आणि वारा असल्याकारणामुळे अनेक ठिकाणी मुंबईकरांची तारांबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे दादर स्टेशन परिसरात पाणी तुंबले होते.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हा परतीचा पाऊस आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे मुंबईकरांची लाही झाली होती. पण, आता या पावसामुळे मुंबईकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
पाऊस सुरू झाला की याचा मोठा फटका बसतो ते ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना.. पाऊस थोडा जरी पडला तरी रेल्वेची वाहतूक उशिरा होऊन जाते. पावसामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मुलुंड, ठाणे, भांडूप, कांजूरमार्ग, पवई, अंधेरीसह नवी मुंबईतल्या ऐरोली भागात मुसळधार पाऊस झाला. डोंबिवली, कल्याण शीळफाटा भागात विजांच्या कडकटांसह पाऊस कोसळला.
फक्त एका तासात दादरमध्ये सर्वाधिक 44 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मिलन सबवे, खार सबवे, अंधेरी सबवे, पोईसर सबवे, मालाड सबवे या भागांत पाणी साचल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेला 29 पंप सुरू करावे लागले.
हेही वाचा -
पाऊस पडला वितभर, शिवाजी पार्क भरले फूटभर