मुंबई अग्निशमन दलानं (MFB) गेल्या दोन आठवड्यांत पालिकेच्या २४ प्रशासकीय प्रभागांमधील तब्बल ९० निवासी इमारतींना नोटीस पाठवल्या आहेत. शहरातील वाढत्या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
MFB नं अधिका-यांची एक विशेष टीम तैनात केली आहे जे वॉर्ड स्तरावर इमारतींना नियमित भेटी देत आहेत. मुंबईत गेल्या काही महिन्यांत आगीच्या अनेक घटना घडल्यामुळे आक्रमक मोहीम हाती घेण्यात आली. आता, MFB हे सुनिश्चित करू इच्छित आहे की, सर्व निवासी मालमत्ता कठोर अग्निसुरक्षा नियमांचं पालन करतात आणि अग्निशामक उपकरणे कार्यरत आहेत.
अनेक उंच इमारतींमध्ये एकतर निकामी अग्निशमन यंत्रणा, निकृष्ट दर्जाचे पाण्याचे पाईप्स आहेत. तर अनेक वर्षांपासून अग्निशमन यंत्रणेच्या देखभालीची कामे केलेली नाहीत हे पाहून अधिकारी चिंतेत पडले.
महाराष्ट्र अग्निशमन कायद्यानुसार, प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला त्यांच्या अग्निशमन यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी जास्तीत जास्त १२० दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण आता हे दिवस कमी करून अवघे ३० दिवस उरले आहेत. जर या सोसायट्यांनी 30 दिवसांच्या आत दुरुस्तीची कामे सुरू केली नाहीत, तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.
HT शी बोलताना मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब म्हणाले की, जर सोसायटी मुदतीच्या आत दुरुस्तीची कामे सुरू करू शकत नसेल तर त्यांनी आधीच तसं सांगावं अन्यथा अधिकारी कारवाई करू शकतात.
“इमारतींना भेट दिल्यानंतर, आमचे अधिकारी अग्निशमन यंत्रणेची तपासणी करतात आणि त्यांना त्यात काही समस्या आढळल्यास, त्या सोडवण्यासाठी मुदत देतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त चार महिन्यांचा कालावधी असला तरी, नोटीस बजावल्यानंतर एक महिन्यात दुरुस्तीची कामे सुरू न झाल्यास आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करू,” असं हेमंत परब यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले की, “काही इमारतींमध्ये दोष आहेत. बूस्टर आणि काही निकामी स्प्रिंकलर आहेत. यापैकी बर्याच समस्या आठवड्यांत सोडवल्या जाऊ शकतात आणि चार महिन्यांचा वेळ लागत नाही. विनाकारण विलंब होत असल्याचं आढळल्यास आम्ही या इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करू.”
पालिकेमधील भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट म्हणाले, “अनेक वर्षांपासून नियम आहेत; मात्र, त्याची आता आक्रमक पातळीवर अंमलबजावणी केली जात आहे. आशा आहे की ही प्रक्रिया सुव्यवस्थित आणि नियमित असेल आणि मध्यभागी पुन्हा ठप्प होणार नाही.”
हेही वाचा