मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव सोमवारी सकाळपासून ओसंडून वाहू लागला. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता १३९.१७ मीटर एवढी असून ही पातळी तलावाने गाठली आहे. तुळशी तलावाच्या निमित्ताने तलाव भरण्याचा श्री गणेशा झाला आहे.
मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळसी आदी तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष अर्थात ३७५ कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. त्यातील भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी आणि विहार या २ तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो.
गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने तुळशी तलावातील पाण्याची पातळी वाढून तलाव ओसंडून वाहू लागल्याची माहिती तुळशी धरणातील जलाभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तुळशी तलाव नेहमीच सर्वात पहिलं भरतं. मुसळधार पाऊस असल्यास हा तलाव दरवर्षी जुलै मध्ये भरतो. त्यानंतर तानसा तलाव भरतो. विहार तलाव छोटा असला तरी तो जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये भरतो.
तलाव क्षेत्रात मुंबईएवढा पाऊस पडत नसला, तरी पाण्याची वाढणारी पातळी समाधानकारक आहे. त्यानुसार सर्व तलावांमध्ये ३८ टक्के एवढा पाण्याचा साठा झाल्याची माहिती महापालिकेचे मुख्य जलअभियंता अशोककुमार तावडिया यांनी दिली. तुळशी तलावही सकाळपासून वाहू लागल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा-
पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी इथं क्लिक करा
वसई मिठागरांत अडकलेल्या ४०० जणांची सुखरूप सुटका