मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमधील जलसाठ्यात घट होऊ लागली असून केवळ दीडशे दिवस पुरेल इतका पाणीसाठा ७ तलावांमध्ये शिल्लक आहे. तसंच उन्हाळ्याच्या कालावधीत होणाऱ्या बाष्पीभवनामुळे मुंबईकरांच्या चिंतेत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्याचाच परिणाम मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांवर झाला होता. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावांमध्ये झाला नव्हता. त्यामुळेच मुंबईत १० टक्के पाणीपुरवठा करण्यात आला होता. तसंच अनेक भागात कमी दाबानेही सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांसमोर आणखी पाणी कपातीचं संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांसाठी वाहून आणल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचं समोर आलं आहे. दररोज ३ हजार ६५० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी वाहून आणलं जातं. यामध्ये जवळपास १३५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपव्यय होतो. तसंच येत्या काही महिन्यांमध्ये वाढणाऱ्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागेल, असं जलविभागाच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं.
हेही वाचा -
आता ट्रॅफिक पोलिस थेट घरी नोटीस पाठवणार
आता ट्रॅफिक पोलिस थेट घरी नोटीस पाठवणार