मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेत वाहनांच्या पार्किंगसाठी महापालिकेनं सार्वजनिक वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, तरीही अनेक वाहन चालक रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करत आहेत. त्यामुळं वाहतुककोंडीच्या समस्या निर्माण होत आहे. तसंच, अनेक ठिकाणी वाहनतळांचे दर अधिक असल्याने सामान्य नागरिक येथे गाड्या पार्क करण्यास नाखूष दिसत आहेत. परिणामी, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगला आळा बसेल हा पालिकेचा अंदाज फोल ठरला आहे.
महापालिकेची अनेक बहुमजली वाहनतळ विविध कारणांमुळं अद्याप बंद अवस्थेत आहेत. अशावेळी अपुऱ्या वाहनतळांसारख्या बिकट प्रश्नावर उपाय म्हणून शहरातील १३ मॉलमधील वाहनतळ बाहेरील वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणं, प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील वाहनांची संख्या ३७ लाखांपार गेली आहे. मात्र, वाहनांच्या तुलनेत मुंबईतील वाहनतळांची संख्या तोकडी आहे.
सोमवार ते शुक्रवार दिवसा आणि रात्री मॉलच्या वाहनतळावर खासगी वाहने उभी करण्यासाठी मॉल प्रशासनांकडून सकारात्मकता दर्शवण्यात आली. ही वाहनतळ सशुल्क असल्याने येथील शुल्क कमी व्हावे यासाठी प्रयत्नही करण्यात आले. मात्र, मोजके मॉल वगळता अनेक ठिकाणी वाहनतळांचे दर अद्याप कमी झालेले नाहीत.
अनेक ठिकाणी पार्किंगसाठी प्रतितास ८०-१०० रु इतके शुल्क आकारले जात आहे. त्यामुळं सामान्यांनी मात्र या पर्यायांकडं पाठ फिरवली आहे. मॉलपासून १०० मीटर अंतरापर्यंत वाहनं उभी केल्यास वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं असूनही अनेक वाहनं रस्त्यांवर पार्क केली जात आहेत.
हेही वाचा -
४ वर्षांत बेस्ट बसच्या फेऱ्यांत 'इतकी' घट
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू