मुंबईतील आणि पर्यायाने राज्यातली हुक्का पार्लर संस्कृती नामशेष करण्यासाठी आता मुंबईकरांनी स्वतः लढायला हवं. ९ जानेवारीपासून मुंबई हुक्कामुक्त करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुंबईत स्वाक्षरी मोहीम राबविणार असल्याची माहिती नितेश राणे याने दिली. मुंबईतील अनेक मोक्याच्या ठिकाणी आणि जेथे हुक्का पार्लर्सची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी आपण ही मोहीम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कमला मिल प्रकरणानंतरही शासनाला अजून जाग आलेली नाही. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा रोजच्या प्रमाणे अनधिकृत बांधकामे आणि हुक्का पार्लर्सची चंगळ सुरु होणार असल्याचं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं. या भ्रष्टाचारी प्रशासनामुळे मुंबईकर सुरक्षित नसल्याने आता स्वतः मुंबईकराने त्याविरुद्ध आवाज उठवायला हवा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अनेक हाऊसिंग सोसायट्यांच्या परिसरात, मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या हुक्का पार्लर परिसरात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते ही मोहीम सुरु करणार आहेत. मुंबईकरांशी संवाद साधून याचे दुष्परिणाम त्यांना सांगून जनजागृती करणार आहेत.
महाराष्ट्र स्वभिमान पक्षातर्फे ही मोहीम २ ते ३ दिवस राबवली जाणार असून १५ तारखेच्या महापालिकेवर नेण्यात येणाऱ्या हल्लाबोल मोर्चात ते याचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच उद्या जर न्यायालयात किंवा प्रशासनापुढे मुंबईकरांच्या या विरोधातील भावना मांडायचा अझालयास याचा उपयोग होईल, असं नितेश राणे म्हणाले.
सत्य समोर असतानाही पालिका त्याला नजरेआड करत आहे. हे महापालिकेचं अपयश आहे. मुंबईकरांच्या जीवाला किंमत नाही हेच यातून स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. मुंबईकर या मोहिमेतून जो लढा उभा करतील निदान त्याकडे पाहून पालिकेला आणि तेथील अधिकाऱ्यांना लाज वाटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-
कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!
युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी