काही दिवसांपूर्वी वांद्रयातील तानसा जलवाहिनी फुटून दोन बालकांचा मृत्यू झाला होता, तर तीन मुले जखमी झाली होती. परंतु या कुटुंबांना कोणत्याही प्रकारची मदत महापालिकेच्या वतीने दिली नसल्यामुळे ही मदत देण्याची मागणी स्थायी समितीने केली होती. परंतु अनधिकृत बांधकामांबाबत झालेल्या दुघर्टनेमध्ये वित्त किंवा जिवीतहानी याबाबत नुकसान भरपाई देण्याबाबत महापालिकेच्या धोरणात कुठलीही तरतूद नसल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थायी समितीतील सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवत खऱ्या अर्थाने असंवेदनशीलचे दर्शन घडवले आहे. सभागृहनेते यशवंत जाधव यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे ही मागणी केली होती.
प्रशासनाने आर्थिक मदतीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून असंवेदनशीलतचे दर्शन घडवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना ताबडतोब आर्थिक मदत दिली जावी, शिवाय जी मुले जखमी झाली आणि ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत पुरवली जावी, अशी मागणी त्यांनी स्थायी समितीत केली.
मुंबईत झाड उन्मळून पडल्यास किंवा झाडाची फांदी पडून कोणी मृत्यू पडल्यास त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याच धर्तीवर या मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले होते. यासाठी आवश्यक असल्यास नव्याने धोरण बनवून त्याप्रमाणे ही मदत दिली जावी, अशाही सूचनाही कोरगावकर यांनी प्रशासनाला केली होती.
हेही वाचा