मुंबईत नालेसफाई प्रमाणेच आता आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबईतील कचरा उचलण्याच्या कंत्राटात नालेसफाई प्रमाणेच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी केला. त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याची चौकशी दक्षता विभागामार्फत करण्याचे आदेश दिलेत. पण खुद्द दक्षता विभागच यापूर्वी घोटाळ्यात अडकल्यामुळे या कचरा घोटाळ्याची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
मुंबईत निर्माण होणारा 8 हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या कचरा कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली जात आहे. पण, 'ज्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली आहेत, त्यांच्या वाहनांवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम लावलेली नसल्यामुळे मोठा घोटाळा झाला. कचरा वाहून नेण्यामध्ये तसेच कचऱ्याऐवजी डेब्रिज वाहून कचऱ्याचे पैसे घेतले' असल्याचा आरोप यापूर्वी काँग्रेसने केला असल्याचे रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे सांगितले.
प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे कचरा कंत्राटदार हवा असताना परिमंडळ निहाय कंत्राटदारांची नेमणूक केली जात आहे. त्यामुळे काही ठराविक कंत्राटदारांचे हित जपले जात असून याला प्रशासनाची साथ असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. त्यामुळे भविष्यात देण्यात येणाऱ्या कंत्राटात सुसूत्रता आणावी, तसेच कचऱ्याच्या वाहनांवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम लावली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेस आमदारांच्या मागणीनुसार कचरा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. ही चौकशी दक्षता विभागामार्फत केली जात आहे. पण रस्ते आणि नालेसफाई घोटाळ्यात दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता हे दोषी होते. त्यांच्यावर प्रशासनाने ठपका ठेवला आहे. त्यामुळे दक्षता विभागाऐवजी ही चौकशी अतिरिक्त आयुक्त किंवा एसआयटीमार्फत केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा -
पालिकेनेच घातले रहिवाशांना नाल्यात!
नालेसफाईबाबत पारदर्शकतेचे पहारेकरी मूग गिळून
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)