आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्याने २ हजारांहून अधिक मतदान केंद्र वाढविण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मतदान केंद्रांची संख्या ९७ हजार ६४० वर पोहोचणार आहे.
विशेष म्हणजे नाशिकमध्ये २७४ वाढीव मतदान केंद्र, पुण्यामध्ये २३७ आणि ठाण्यामध्ये २२७ वाढीव मतदान केंद्र असणार आहेत. साधारणपणे १ हजार ४०० मतदारांमागे १ मतदान केंद्र असण्याचं प्रमाण आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचं दिसून आल्यानं मतदान केंद्राचीही वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी यापूर्वी ९५ हजार ४७३ मतदान केंद्र स्थापन करण्याचं नियोजन होतं. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्यानं नव्यानं २ हजार १६७ मतदान केंद्र राज्यभरात वाढविण्यात आली आहेत.
२००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्र स्थापन करण्यात आली होती. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये ९७ हजार ६४० मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणं, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो.
हेही वाचा -
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ८०० तक्रारी
गोपाळ शेट्टींचा अर्ज दाखल; केलं जोरदार शक्तीप्रदर्शन