लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतून आपला अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपला अर्ज भरला.
मुंबईत अर्ज भरण्याची सुरू झाल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी मंगळवारी बोरीवली ते मालाडदरम्यान रॅली काढत आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार मनिषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर, आमदार विलास पोतनीस आदी नेतेही उपस्थित होते.
गोपाळ शेट्टी हे भाजपाचे दिग्गज नेते मानले जातात. यापूर्वी त्यांनी आमदार आणि नगरसेवक म्हणूनही नेतृत्व केलं आहे. यावेळी गोपाळ शेट्टी यांच्यासमोर नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर हिचं आव्हान असणार आहे. काँग्रेसनं उर्मिला मातोंडकर हिला नुकतीच उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर तिनेही पूर्ण ताकदीनीशी आपल्या मतदारसंघात लोकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.
२०१४ साली गोपाळ शेट्टी यांचा सामना काँग्रेस मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्याशी झाला होता. त्यावेळी संजय निरूपम यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा -
शेतकऱ्यांसाठी 'स्वतंत्र अर्थसंकल्प', काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
उर्मिलाने चालवली रिक्षा, गोराईतील रिक्षा चालकांना केलं खूश