राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून, लशीची एक मात्रा घेतलेल्यांनाही दिवाळीनंतर उपनगरी रेल्वे, मॉल व अन्यत्र प्रवेश देण्याबाबतच विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
याआधीच कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं शाळा, महाविद्यालये, चित्रपट तसेच नाट्यगृहे खुली करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कृतिगटाशी चर्चा करून दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले.
राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. दिवाळीनंतर रुग्णसंख्येचा आढावा घेऊन व कृतिगटाशी चर्चा करून एक लस मात्रा घेतलेल्यांनाही सर्वत्र मुभा देण्याचा विचार होऊ शकेल, असे टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटत असून, दिवसभरात १,७१५ नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या कालावधीत एकही नवा रुग्ण आढळला नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील २ जिल्ह्यांमधील रुग्णही कमी झाले आहेत. दिवसभरात मुंबई ३६६, नगर २१७, पुणे जिल्हा २३७, पुणे शहर १०६, सातारा ६९, सोलापूर ६४ रुग्ण आढळले.