पीएमसी म्हणजेच पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेच्या खातेधाकरांनी मुंबईत भारतीय रिझर्व्ह (आरबीआय) बँकेच्या बाहेर निदर्शनं केली. पीएमसी बँकेत ग्राहकांचे जवळपास ११ हजार ५०० कोटी रुपये जमा आहेत. फक्त मुंबईत नाही तर बँकेच्या शाखा महाराष्ट्र, दिल्ली आणि गोवा इथं देखील आहेत. या सर्व शाखांमधून ग्राहकांचे लाखो रुपये अडकले आहेत.
२३ सप्टेंबरला भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहा महिने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. सुरुवातीला फक्त दोन हजार रुपये खातेधारकांना काढण्याची परवानगी होती. नंतर मर्यादा वाढवत १० हजार मग २५ हजार करण्यात आली. नुकतीच पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार करण्यात आली आहे. पण फक्त आप्तकालीनस्थितीत, मुलांची फी भरण्यासाठी आणि औषध पाण्यासाठी हे ५० हजार रुपये काढण्याची परवानगी आहे.
पीएमसी बँकेच्या १३७ शाखा आहेत. पीएमसी बँकेच्या व्यवस्थापनानं कर्ज वितरण सुविधेबाबत आरबीआयला चुकीची माहिती दिली. त्यानंतर आरबीआयनं बँकेवर निर्बंध आणले. बँकेच्या खातेधारकांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण १८ ऑक्टोबरला होणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितलं.
हेही वाचा