गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसानं जुलै महिन्याच्या सुरूवातीला दणक्यात सुरूवात केली आहे. हा पाऊस असाच राहण्याची शक्यता अाहे. येत्या ५ दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
मंगळवारी २ जुलैला झालेल्या पावसानं मुंबईला जोरदार दणका दिला. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं मंगळवारी पहाटेपासूनच जोर धरला. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कोसळला... आणि एकच गोंधळ उडला. त्यानंतर पश्चिम रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली.
रेल्वे सेवा ठप्प झाल्यानं अनेक नोकरदारांनी आपला मोर्चा रस्ते मार्गाकडं वळवला. परंतु मुसळधार पावसामुळं पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहतूक संथ गतीनं सुरू होती. त्यातच हिंदमाता, वांद्रे, सांताक्रुझ या सखल भागात पाणी तुंबल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. त्याशिवाय कुर्ला, सायन, चेंबूर या रेल्वे रूळावरही पाणी साचल्यानं रेल्वे सेवा उशीरानं सुरू होती. पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी अंधेरी ते सीएसएमटी व अंधेरी ते पनवेल या दोन रेल्वे रवाना झाल्या.
सध्या मुंबईसह, ठाणे, पालघर, कोकण पट्ट्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली अाहे. सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सांताक्रुज परिसरात ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच येत्या काही तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असून पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
- महेश पालावत, हवामान तज्ज्ञ, स्कायमेट
हेही वाचा -
अंधेरी पूल दुर्घटना : बेस्ट, मेट्रो ठरली प्रवाशांची तारणहार
तब्बल सात तासांनंतर हार्बर सेवा सुरू