गेल्या ६ दिवसांपासून आर्थर रोड तुरूंगात असलेल्या ८ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना अखेर सत्र न्यालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर या सगळ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना पुढील महिनाभर या सगळ्यांना दर आठवड्याला आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे.
शुक्रवार १ डिसेंबर रोजी सकाळी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेस ऑफिसची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. ही तोडफोड होताच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांच्या धरपकडीला सुरूवात करत संदीप देशपांडेसह अन्य ७ जणांना अटक केली.
शुक्रवारी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांनतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. न्यायालायीन कोठडी मिळाल्यांनतर बुधवारी या सगळ्यांनी जामिनासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केल्यावर पोलिसांनी लावलेली कडक कलम बघत न्यायालयाने या सगळ्यांना जामीन नाकारला. यावेळी तुम्हाला बाहेर सोडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं मत देखील न्यायालयाने नोंदवलं होतं.
दंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वरच्या न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सगळ्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यामध्ये मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, विशाल कोकणे, संतोष धुरी, अभय मालप, सरोदे दिवाकर पडवळ, योगेश छिले, हरीश सोलंकी यांचा समावेश आहे.
हेही वाचा-
वेडात मनसे कार्यकर्ते पोहोचले 'कारागृहात'!