मुंबईसह उपनगरात शुक्रवारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं जोरदान हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरं जावं लागतं आहे. त्याशिवाय, रेल्वे वाहतूकीवर देखील या पावसाचा परिणाम झाला आहे. पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वे उशिरानं धावत आहे. तसंच, काही भागांत झाडं कोसळून गाड्यांच नुकसान झालं आहे. मुंबईत शनिवारी सकाळी १२७ मिमी, पश्चिम उपनगरात १७० आणि पूर्व उपनगरात १९७ पावसाचं नोंद झाली आहे.
घाटकोपर येथे एकविरा दर्शन सोसायटीची संरक्षक भींत पार्क केलेल्या ५ ते ६ वाहनांवर कोसळली. त्यामुळं तब्बल ६ वाहनांचं नुकसान झालं आहे. तर, सायन कोळीवाडा येथील परिसरात झाड कोसळून टॅक्सी आणि काही गाड्यांच नुकसान झालं आहे.
मुंबईतील जोरदार पावसामुळं रेल्वेवरही परिणाम झाला आहे. पावसाचं पाणी रेल्वे रुळांवर साचल्यानं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम आणि हार्बर रेल्वे वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिरानं सुरू आहे, तसंच मध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिट उशिरान सुरू आहे.
पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ च्या कोपऱ्यातील काहीसा भाग खचला आहे. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं याची दखल घेतली असून, बॅरिगेट्स लावून खचलेला भाग दुरूस्त करत आहेत.
हेही वाचा -
घाटकोपरमध्ये ९ तासांत पडला २८० मि.मि. पाऊस, आणखी २४ तास बरसणार