शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून अंबरनाथ, मांगरूळ इथं ८० एकर जागेवर १ लाखांहून अधिक झाडं लावण्यात आली होती. या झाडांमधील ७० टक्के झाडं नुकतीच भूमाफीयांनी जाळली. या प्रकाराला वनविभाग जबाबदार असल्याचं म्हणत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मुख्य वनसंरक्षकाच्या कार्यालयावर धडक दिली. इथं आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घालून वनअधिकाऱ्यांच्या तोंडाला राख फासली.
खासदार शिंदे यांनी गेल्या वर्षी ५ जुलै २०१७ ला वनविभागाच्या ८० एकर जागेवर वृक्षारोपण महाअभियानांतर्गत १ लाख झाडं लावली होती. या झाडांना १९ डिसेंबर २०१७ ला समाजकंटकांनी आग लावली. त्यात २० हजार झाडं जळून खाक झाली. त्यानंतर शिवसेनेनं तात्काळ याप्रकरणी पोलिस आणि वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर पोलिस आणि वनविभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यातच पुन्हा गेल्या आठवड्यात मांगरूळ येथील झाडांवर समाजकंटकांची वक्रदृष्टी पडली आणि त्यांनी या झाडांना पुन्हा आग लावून दिली.
या आगीत ७० टक्क्यांहून अधिक झाडं जळून राख झाली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून वनविभागावर टीका होत आहे. याआधीच्या तक्रारीकडे पोलिस आणि वनविभागानं लक्ष दिलं असतं तर हा प्रकार घडलाच नसल्याचं म्हणत याप्रकरणी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. सोमवारी खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं ठाण्यातील कोपरी येथील वनविभागाच्या कार्यालयावर धडक घेतली.
आंदोलकांनी वनविभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वनरक्षक अधिकार्याच्या निलंबानाची मागणी उचलून धरली. तर या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जळालेल्या झाडांची राख वन अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासली, जळालेली झाडं, कुंड्या वन विभागाच्या कार्यालय परिसरात फेकून दिली. यामुळं इथं वातावरण चांगलचं तंग झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
भूमाफिया आणि मातीमाफियांचा डोळा या जागेवर असून त्यांच्याकडूनच झाडं जाळण्याचा प्रकार वारंवार होत आहे. असं असताना वनविभाग मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप यावेळी खा. शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच भूमाफिया-मातीमाफियांचं फावत असल्यानं वनसंरक्षक अधिकाऱ्यांचं निलंबन करत इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यानुसार वनसंरक्षक चंद्रकांत शेळके यांचं निलंबन करण्यात आल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. इतर अधिकाऱ्यांवरही कारवाईचं आश्वासन देत झाडांची काळजी घेण्याचं वनविभागाकडून आश्वासित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा-
फक्त ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाजवायचीय का? श्रीकांत शिंदे
५ हजार फुलझाडांनी सजला मंत्रालय परिसर