मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांत चांगलाच पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईच्या आसपासच्या कर्जत, खोपोली, खालापूर परिसरातील निसर्गसौंदर्यात भर पडली असून या परिसरातील धबधबे मुंबईकरांना खुणवू लागले आहेत. कित्येक फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभं राहणं म्हणजे अत्यानंदच. या विकेंडला कर्जत, खालापूर, कसारा परिसरात जाण्याचा प्लॅनही अनेकांनी आखला असेल. पण असा प्लॅन करणाऱ्यांचा आता चांगलाच भ्रमनिरास होणार आहे. हो, भ्रमनिरास. कारण मुंबईकरांनो, खोपोली, कर्जत आणि खालापूरमधील धबधब्यांवर तुम्हाला अाता जाता येणार नाही. या परिसरातील धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं आता धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांना तुंगारेश्वर-चिंचोटी, खंडाळा-लोणावळा नाही तर थेट कोकणामध्येच धाव घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
कर्जत, खोपली आणि खालापूर परिसरातील धबधब्यांकडे येणाऱ्या पर्यटकांचा कल गेल्या काही वर्षात खूपच वाढला आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये पर्यटकांची संख्या कित्येक पटीनं वाढते. मात्र त्याचवेळी या परिसरातील अनेक धबधबे धोकादायकही आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास हे धबधबे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात.
त्यातच प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देऊनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि उत्साहाच्या भरात जीवाला धोका निर्माण करून घेतात. त्यामुळे रायगड प्रशासनानं सर्तकतेचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व धबधब्यांवर प्रवेश बंदी केली आहे. कर्जत प्रातांधिकाऱ्यांकडून यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले असून पोलिसांनाही यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खोपोलीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव, खालापूर दोनवत धरण, कर्जत सोलनपाडा धरण, आशाने धबधबा यासारखे अनेक नितांत सुंदर धबधबे मुंबईकरांना नेहमीच खुणावत असतात. पण आता या धबधब्यांवर जाऊन कित्येक उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यास अंगावर झेलण्याचा आनंद घेता येणार नाही, हेच खरे.
हेही वाचा -
'हे' ९ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका
मेघडंबरीतील 'सेल्फी' भोवली, रितेशला मागावी लागली माफी