मुंबईत बेशिस्त वाहन चालकांमुळे रस्ते अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या बेशिस्त वाहन चालकांना अद्दल घडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता टोकाचं पाऊल उचललं आहे. यापुढे वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलिसांकडून संबधित चालकावर भा.दं.वि २८३ (सार्वजनिक रस्ते आणि मार्गावर अडथळा निर्माण करून नागरिकांच्या जिवास धोका निर्माण) यानुसार गुन्हे नोंदवण्यात येत असून १ आॅक्टोबरपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांवर अशा प्रकारचे गुन्हे नोंदवले आहेत
मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो आणि मोनोच्या कामामुळे आधिच वाहतुकीचा वेग मंदावला असताना बेशिस्त वाहन चालकांची त्यात भर पडली आहे. याच बेशिस्त वाहनचाकांमुळे रस्ते अपघातातही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ४० मिनिटाला एक अपघात होत असल्याचं वाहतूक पोलिसांकडे असलेल्या आकडेवारीतून पुढे आलं आहे. यात प्रामुख्याने वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे घडलेल्या अपघातांचं प्रमाण सर्वाधिक आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
या बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ई-चलान ही नवी संकल्पना सुरू केली खरी, मात्र तरीही अनेक चालक पैसे भरून सुधारायचं नाव घेत नाहीत. त्यामुळे अशा वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी आता फास आवळण्यास सुरूवात केली आहे.
नियमांचं उल्लघंन करणाऱ्या बेशिस्त चालकांवर आता थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे. यामध्ये सिग्नल तोडणारे, नो पार्केंगमध्ये गाडी उभी करून सार्वजिनक वाहतुकीला अडथळा ठरणारे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणारे, परवाना नसताना गाडी चालवणाऱ्यांना पोलिसांनी लक्ष केलं आहे. या कारवाईची नोटीस पोलिसांनी १६ आॅक्टोबरपासून काढल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
हेही वाचा -
मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा ३० टक्के भाग धोकादायक!
वाहतूक पोलिसांची ई-चलान दंडवसुली घटली