केरळमध्ये महापुरानं सध्या हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या महापुरामुळे ३५० पेक्षा जास्त जणांना अापले प्राण गमवावे लागले अाहेत. शतकातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा केरळला सामना करावा लागतोय. सध्या केरळमधील ६ लाख ६१ हजार ८८७ नागरिक विविध मदत शिबिरांमध्ये आश्रयाला आहेत. तब्बल २ लाख कुटुंबं बेघर झाली आहेत. मुंबईसह देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत पोहोचवली जात आहे. मुंबईतील विविध संस्था, रुग्णालयं केरळच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या असून त्यांच्याकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी विविध औषधं, जीवनावश्यक वस्तू पाठवल्या जात आहेत.
केईएम रुग्णालयाकडून केरऴमधील लोकांसाठी मदत पाठवली जात आहे. विविध प्रकारची औषधं, सॅनिटरी नॅपकिन्सचा यामध्ये समावेश आहे. केईएम रुग्णालयातील डॉक्टरसुध्दा वैयक्तिक पातळीवर अापल्याकडून त्यांना मदत करत अाहेत. शुक्रवारी अाणि शनिवारी विमान व बोटीच्या साहाय्याने काही प्रमाणात अौषधं व जीवनावश्यक वस्तूंचा साठा पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात अाला.
मुंबईतील पहल या संस्थेकडून केरळमध्ये फक्त औषधांच्या स्वरूपात मदत पाठवण्यात येत आहे. औषधांच्या विक्रेत्यांकडूनच थेट औषध घेऊन ते केरऴला पाठवण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी काही डॉक्टर आणि त्यांचे सहकारी अशी जवळपास २२ लोकांची पहलची एक टीम केरळच्या इडुक्की जिल्ह्यामध्ये मदतीसाठी जाणार आहे, अशी माहिती पहल संस्थेच्या समन्वयक तस्निम शेख यांनी दिली.
मुंबईच्या परिवर्तन आणि सेवक या संस्थेकडून २० ते २३ ऑगस्टदरम्यान केरळवासीयांच्या मदतीसाठी विविध स्वरूपात वस्तू गोळा करण्यात येणार आहेत. धान्य, साबण, टुथपेस्ट, टुथब्रश, चादर, ब्लॅँकेट, चप्पल, बिस्कीटे, साड्या, लहान मुलांचे कपडे अशा स्वरूपात आपणही मदत करू शकता. जयप्रकाश नगर, 68 नेपियन्सी रोड, रुंगटा लेन, मुंबई या ठिकाणी संध्याकळी ६ ते ९ या वेळेत वस्तूस्वरूपात मदत आणून देण्याचे आवाहन परिवर्तन संस्थेचे समन्वयक तुषार वरंग यांनी केलं आहे.
हेही वाचा -
केरळच्या पूरग्रस्तांना मुंबईकरांचा मदतीचा हात
मुंबईतील खासदार, नगरसेवकांचाही केरळच्या पुरग्रस्तांसाठी हातभार