देशभरातील मतदारांना देण्यात येणाऱ्या निवडणूक ओळखपत्रांसाठी महिनाभर कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे.
या प्रकियेत सुधारणा करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने आता ओळखपत्र (voter id) 15 दिवसांत देण्याचा संकल्प निश्चित केला आहे. त्यासाठी राज्य (maharashtra) निवडणूक आयोगाने शिफारस केलेल्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या नव्या मानक पद्धतीमुळे मतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे (central election commission) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे. मतदारांसाठी सुलभ व जलद सेवा देणे, हा आयोगाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी आयोगाने म्हटले आहे.
या नव्या प्रणालीत मतदार नोंदणी अधिकारी (ERO) ओळखपत्र तयार करताच त्याची ट्रॅकिंग प्रक्रिया सुरू होईल आणि भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून कार्ड वितरित होईपर्यंत ती चालू राहील.
मतदारांना त्यांच्या कार्डच्या स्थितीबाबत प्रत्येक टप्प्यावर एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी निवडणूक आयोगाने नुकतेच सुरू केलेल्या ईसीआयनेट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक विशेष आयटी प्रणाली विकसित केली आहे.
तसेच टपाल विभागाच्या एपीआय प्रणालीची ईसीआयनेट सोबत संलग्नता केली जाणार असून, या माध्यमातून निवडणूक ओळखपत्र वितरण अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
हेही वाचा