गतवर्षी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळं दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील संरक्षण भिंत कोसळली. बाबुलनाथ जंक्शन परिसरातील व केम्स कॉर्नर जवळील एन. एस. पाटकर मार्गालगतचा टेकडी उताराचा हा भाग खचला होता. या घटनेनंतर त्या ठिकाणी संरक्षक भिंतीचं बांधकाम व रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं काम महापालिकेनं (bmc) हाती घेतलं होतं. हे काम विक्रमी वेळेत पुर्ण झालं आहे.
अवघ्या ६ महिन्यांत या संरक्षक भिंतीचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळं एन. एस.पाटकर मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी मलबार हिल परिसरात तब्बल ३५७ मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळं दक्षिण मुंबई परिसरातील बाबुलनाथ जंक्शन जवळ असणाऱ्या एन. एस. पाटकर मार्गाला लागून असणारा टेकडीच्या उताराचा भाग ढासळला होता. परिणामी टेकडीच्या वरुन जाणारा बी. जी. खेर मार्ग देखील प्रभावीत होऊन धोकादायक झाल्यानं दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली होती.
अतिवृष्टीमुळे टेकडीचा भाग खचल्यानंतर आय. आय. टी., मुंबई यांच्या सहकार्याने तज्ज्ञ समिती नेमून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. या सल्लागारांच्या सुचनांनुसार ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. या टेकडीच्या उतारालगत व एन. एस. पाटकर मार्गालगत मलबार हिलच्या बाधित भागाचे बळकटीकरण, संरक्षक भिंत उभारणे आणि रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम १ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करून गुरुवारपासून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे.
'असं' केलं बांधकाम
हेही वाचा -