मुंबईतील वांद्रे ते वर्सोवा या सीलिंकच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वांद्र्याच्या दिशेकडील जमिनीवरील कामास वेगानं सुरुवात करण्यात आल्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समोर आली आहे. मात्र, या प्रकल्पाच्या ‘कास्टिंग यार्ड’च्या जागेचा मुद्दा अजूनही अधांतरीच आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाचं कंत्राट रिलायन्स इन्फ्राला देण्यात आले आहे.
सध्यस्थितीत वांद्रेकडील जमिनीवरील कामाला सुरुवात झाली आहे. तसंच, महिनाभरात समुद्रातील कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागणार असल्याचं समजतं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील सहा महिन्यांतील प्रकल्पांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर या सी-लिंकच्या कामावरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.
वर्सोवाच्या बाजूने सी लिंकच्या खांबांसाठी सुरुवातीला १५० चौरस मीटर क्षेत्रावरील खारफुटी तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र, उच्च न्यायालयात परवानगी मागताना ३० हजार चौरस किमीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यास उच्च न्यायालयात नकार दिल्यानंतर ते प्रकरणदेखील सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडं असून, अजूनही हे प्रकरण न्यायालयातच आहे.
या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च ४ हजार कोटी रुपये होता. परंतु, २०१६ नंतर हा खर्च १२ हजार कोटींवर गेला. सध्या रिलायन्स इन्फ्राला सुमारे ७ हजार कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे.
हेही वाचा -
महापरिनिर्वाण दिन: लाखो आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल
'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा?