मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीतील सर्व सदस्यांनी शुक्रवारी आपले एकत्रित राजीनामे सादर केले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ऍड हॉक समितीची बैठक होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. यामध्ये रणजी व २३ वर्षांखालील निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर याच्यासह नीलेश कुलकर्णी, सुनील मोरे आणि रवी ठक्कर यांचा समावेश आहे.
गुरुवारी रात्री इंदोरमध्ये सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह प्रथमश्रेणी हंगामाची सांगता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निवड समितीने राजीनामे दिले. यापूर्वी एमसीएच्या सदस्य क्लब्सकडून बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत निवड समिती सदस्यांना काढून टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यामुळे निवड समितीतील सदस्य दडपणाखाली होते. मात्र, त्यानंतर क्रिकेट सुधारणा समितीने निवडकर्त्यांची पाठराखण केली होती.
मुंबईच्या निवड समितीवर संघनिवडीवरून आरोप करण्यात आले होते. तसेच खेळाडूंचा खेळ मैदानात प्रत्यक्ष जाऊन न बघता मुंबई संघाची निवड केली जात असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती.
हेही वाचा -
हिमालय पूलाच्या दुर्घटनेनंतर ३० पादचारी पुलांची तातडीने दुरुस्ती