देशात लोकसभा निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले असताना शहरात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई उपनगरात राजकीय नेत्यांच्या अनधिकृत जाहिरातीविरोधात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवर प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे ९ हजार २९८ फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेडे काढून टकण्यात आले आहेत.
देशात १० मार्चपासून आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेचा भंग होऊ न देण्याच्या सूचना संबंधीत पक्ष आणि नेत्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही नियमांचं उल्लंघन करून अनेकांनी आपल्या नेत्यांचे मोठ-मोठे फलक मुंबई उपनगराच्या चौकात उभे केले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लघंन करणारे फलक, बोर्ड, बॅनर, झेंडे पोलिसांच्या मदतीने काढण्यास सुरूवात केली. मुंबई उपनगरात विविध नेत्यांच्या जाहिरातीचे ९ हजार २९८ फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेडे काढून टाकण्यात आले आहेत. तर, खाजगी मालमत्तेवरील २ हजार २६० असे एकूण ११ हजार ५५८ फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेंडे काढले आहेत.
अनधिकृत जाहिरात फलकांच्या १६ प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहकार्य करण्यासाठी सह आयुक्त/ उपायुक्त यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या सहायक आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे.
हेही वाचा -
हिमालय दुर्घटनेची पोलिस करणार स्वतंत्र चौकशी
अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून अश्लील चित्रीकरण