मुंबईच्या पश्चिम उपनगरात महागड्या गाड्यांची चोरी करणाऱ्या ४ सराईत आरोपींना परिमंडळ १२ च्या पोलिसांनी अटक केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २८ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून या पूर्वी या गुन्ह्यात १२ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबईत दररोज १० ते १२ दुचाकी वाहनांची चोरी होते. मात्र एखाद्या गुन्ह्यात आरोपींना अटक होत आहे. मागील अनेक दिवसांपासून पश्चिम उपनगरात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकुळ घातला होता. खास करून उत्तर मुंबई परिसरातील पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले जात होते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं होतं. या पथकात झोन ११ आणि झोन १२ मधील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. या पथकाने मागील दोन आठवड्यात वाहन चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला.
ही टोळी इतकी सराईत होती की, अवघ्या काही मिनिटात ते दुचाकी चोरून पसार व्हायचे. या टोळीतील एका सदस्याच्या अटकेनंतर तब्बल १५ जणांची नावे पुढे आली. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक केली. या १६ मध्ये शादाब शाहिद शेख, इम्रान मन्सूर खान, सिद्धार्थ कसबे, गुरफान मेहदी हसन हे चौघे ही टोळी चालवत होते. या टोळीकडून पोलिसांनी आतापर्यंत २८ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या टोळीतील आरोपींच्या चौकशीतून मुंबईतील अनेक वाहन चोरीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली. आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबईत २०१६ मध्ये तब्बल ३११८ गाड्या चोरीला गेल्याची नोंद असून त्यातील ८६१ गाड्या शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर २०१७ मध्ये वाहन चोरीचं प्रमाण काही प्रमाणात कमी असलं तरी वर्षभरात ३०१२ गाड्या चोरीला गेल्याची नोंद आहे. तर यातील ९३५ गाड्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा -
बीडीडी चाळीतील ५०० रहिवाशांंना एसीबीकडून चौकशीसाठी बोलवलं
३ कोटींना बँकेला चुना लावणारा अटकेत