दहिसरमध्ये सिलेंडर गॅस लीक झाल्यामुळे चार जण गंभीररित्या भाजल्याची घटना मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत मीनाक्षी रावण (वय ३८), प्राची (वय १५), चिराग (वय १२) आणि सुभाष पाटकर (वय ४७) हे भाजले असून त्यांना उपचारांसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहिसरच्या रमा रजपूत चाळ, शिवाजी चौक, रावळपाडा, येथे रावण कुटुंबिय राहतात. सकाळी ८ च्या सुमापास मनिषा स्वयंपाक बनवत असताना अचानक गॅस संपला. त्यावेळी मनिषा यांनी दुसरा सिलेंडर जोडला. मात्र, हा सिलेंडर व्यवस्थित न लावल्यामुळे त्यातून गॅस लीक झाला.
हा गॅस घरातल्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानंतर आगीचा मोठा भडका उडाला. त्यावेळी घरात असलेले मनिषा, प्राची व चिराग हे गंभीररित्या भाजले. आगीचा भडका इतका मोठा होता की, घराबाहेरून जाणारे सुभाष पाटकर हेही त्यात भाजले.
स्थानिकांनी वेळीच अग्निशमन दलाला पाचरण करत जखमींना उपचारांसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तर पाटकर यांच्यावर अशोका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाती गुन्ह्याची नोंद केली आहे.
हेही वाचा
'डॅडी'नंतर 'मम्मी' पोलिसांच्या रडारवर!