२६/११ च्या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवल्यावर मुंबईवर आता हल्ला करणे तितकेसे सोपे नसल्याने दहशतवाद्यांनी मुंबईतीलच तरुणांची माथी भडकवण्यास सुरूवात केली आहे. घर बसल्या घातक शस्त्रे कशी बनवायची? याचे इंटरनेटद्वारे ट्रेनिंग देऊन त्यांना देशाविरोधात काम करण्यास प्रवृत्त केले जात आहे. जहाल आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया'(आयएस) ही दहशतवादी संघटना सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महाराष्ट्र एटीएसमधील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघटनेच्या वाटेवर असलेल्या महाराष्ट्रातील ११८ तरुणांना थांबवण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) यश आले आहे. विशेष म्हणजे यापैकी २० तरुण मुंबईचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणांच्या मनात धार्मिक विद्वेष रूजवून त्यांना कट्टरपंथीय बनवायचे आणि यथावकाश त्यांच्याकडून घातपाती कारवाया करवून घेण्यात सराईत असणाऱ्या आयएसच्या कथित हँडलरकडून या तरुणांना शपथही दिली हाती. ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून या तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले होते. भारत हा मुस्लिम धर्माच्या विरोधात असल्याचे या तरुणांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न सुरू होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या तरुणांना भडकावण्याचे काम सुरू होते. या चिथावणीला भुलून हे तरुण आयएसमध्ये सामील होण्याच्या मार्गावर होते.
या सर्व प्रकाराची कुणकुण एटीएसला लागल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. एटीएसने केलेल्या चौकशीत या तरुणांनी आयएसमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी सुरू असल्याची कबुली दिली. त्यानंतर या सर्व तरुणांचे समुपदेशन करून त्यांना थांबवण्यात एटीएसला यश आले. आयएस संदर्भातील ५०० हून अधिक संकेतस्थळे आतापर्यंत एटीएसने बंद केली आहेत. आयएसच्या बाबतीत कारवाई करण्यासंदर्भात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र एटीएसची ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे बोलले जाते.
जगभरातील मुस्लिम तरुणांची माथी भडकावून कालांतराने त्यांना घातपाती कारवाया करण्यास उद्युक्त करणे हा आयएसचा मुख्य अजेंडा आहे. आतापर्यंत तरुणांच्या एखाद्या गटाचे ब्रेनवॉशिंग केले जात होते. या कार्यपद्धतीत बदल झाला असून आता प्रत्येक तरुणावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येकाला वेगळ्या धर्तीचे प्रशिक्षण दिले जाते आणि एक प्रकारे त्यांना जहाल दहशतवादी बनवण्याच्या दृष्टीने शिकवण दिली जाते.
आयएसच्या वाटेवर असलेल्या तरुण-तरुणींचे पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतरही ही मुले पुन्हा त्या वाटेवर जाणार नाहीत, याची खात्री देता येत नाही. पोलिसांनी समुपदेशन केले, तरी त्यांना पुन्हा कसा गुंगारा द्यायचा? याचेही प्रशिक्षण त्यांना दिलेले असते. त्यामुळे अशा प्रकारे ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांवर पोलिसांना भविष्यातही लक्ष ठेवावे लागते.
हेही वाचा
फहिमची 'अशी'ही 'मचमच', 'डी गॅंग'च्या नावाने तीन व्यावसायिकांना धमक्या