लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. सरकारनं वाढत्या विलासंदर्भात कुठली ठोस पावलं अजून तरी उचलली नाहीत. त्यामुळे आता मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलनं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. वाशी सेक्टर १७ मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वीज बिल दरवाढीचा निषेध केला आहे.
काही दिवसांपूर्वी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. वीज प्रश्नावर राज्य सरकारचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. भरमसाठ वीज बिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यांवर प्रहारच आहे, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं. वीज बिलांच्या मुद्यावर मनसे शांत राहील अशी चुकीची समजूत सरकारनं करून घेऊ नये, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता.
हेही वाचा : 'या' झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले
दरम्यान, ‘बेस्ट’च्या वाढीव वीज बिलाबाबत मनसेच्या शिष्टमंडळानं गेल्या महिन्यात बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, ‘बेस्ट’च्या ग्राहकांनी सध्या फक्त ५० टक्के वीज बिल भरावं, असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं होतं.
त्यावेळी मुंबई शहर परिसरातील बेस्टच्या वाढीव वीज बिलांच्या शकडो तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विभागीय अभियंत्यांना देण्यात आल्या. “कुणाचंही वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. सध्या पन्नास टक्के बिल भरा आणि उर्वरित रिडींगनंतर भरा” असं आश्वासन विभागीय अभियंत्यांनी दिल्याचा दाव दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता.
हेही वाचा