Exclusive : काश्मिरपेक्षा महाराष्ट्र हिंसक, कसा ते वाचा ...


Exclusive : काश्मिरपेक्षा महाराष्ट्र हिंसक, कसा ते वाचा ...
SHARES

देशातील कोणत्याही राज्यात पोलिसांनी परिस्थिती निवारणासाठी केलेल्या लाठीचार्जमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. विशेष म्हणजे या लाठीचार्जमध्ये काश्मिरपेक्षा महाराष्ट्रात अधिक नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. या प्रकरणी राज्यातील पोलिसांवर २०१७ मध्ये ४५६ गुन्हे दाखल असून ३२७ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यातील कोणत्याही गुन्ह्यांत वर्षभरात कोणालाही अटक झाली नव्हती.

 महाराष्ट्रात २०१७ मध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याप्रकरणी ४५६ गुन्हे नोंदवण्यात आले. त्या गुन्ह्यांतील २३७ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तर ३५ गुन्हे कायदेशीर प्रक्रियेनंतर रद्द करण्यात आले आहेत. राज्यात २०१७ मध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये २३० जण जखमी झाले आहेत. संपूर्ण देशात या काळात ४४७ व्यक्ती जखमी झाले होते. देशातील एकूण लाठीचार्जच्या घटनांमध्ये जखमी झालेल्या नागरीकांपैकी ५० टक्के नागरीक एकट्या महाराष्ट्रातील लाठीचार्जमध्ये जखमी झाले आहे. जम्मू काश्मिरमध्ये या काळात केवळ ४९ व्यक्ती पोलिस लाठीचार्जमध्ये जखमी झाले होते.

 या घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जानेवारी २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे राज्यभरातून आतापर्यंत ६४९ तक्रारी आल्या होत्या. २०१७ मध्ये पोलिस रिमांड नसताना पाच आरोपींचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्यातील एका प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तर पोलिस रिमांड असताना १० आरोपींचा मृत्यू झाला होता. त्यात सात आरोपींनी आत्महत्या केली होती. तर एकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. तर दोघांचा अपघातात मृत्यू झाला होता. वर्षभरात पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी सात पोलिसांना अटकही झाली होती. पोलिसांविरोधात आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जात असल्यामुळे ही संख्या अधिक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा -

अनधिकृतपणे रेल्वे तिकीटांची विक्री करणाऱ्यांवर मध्य रेल्वेची कारवाई

एसटी चालकाचे अपहरण करून लुटणारे अटकेत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा