मुंबईत भविष्यात कुठलाही गुन्हा करण्यापूर्वी आरोपींना आता दहा वेळा विचार करावा लागेल. कारण की मुंबईच्या गल्लीबोळ्यात ही पोलिस त्यांच्या तिसऱ्या डोळ्याने प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. २६/११ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईच्या महत्वांच्या रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या सीसीटिव्हींचे जाळे आता पोलिस मुंबईतल्या गल्लीबोळातही लावण्याच्या प्रयत्नात आहेत. शहरात तब्बल ३ लाख सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे लक्ष ठेवले आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून लवकरच मुंबई पोलिसांना सात हजार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे मिळणार आहेत.
हेही वाचाः- जेईई मेन्स परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
२६/११ च्या दहशतवादी हल्यानंतर मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ५ हजार सीसीटिव्ही कॅमेरे मुंबईतील महत्वाच्या रस्त्यांवर बसवण्यात आले. त्यानंतर फडणवीस सरकारने त्यात वाढ केली. मात्र तरीही मुंबईतल्या अनेक गल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमरे नसल्याचा भूरटे चोर फायदा घेतात, अनेकदा एखाद्या गल्लीत घडलेल्या गुन्ह्यात आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना कठीण होते. असे गुन्हे तत्काळ पोलिसांच्या रेकाँर्डला पडून राहतात. त्यामुळेच सीसीटीव्हीच्या मदतीने शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात यश येऊ शकते, तसेच मोठ्या महानगरांवर लक्ष ठेवण्याचे प्रमुख साधन ठरू शकते, या संकल्पनेतून मुंबई पोलिसांनी खासगी आस्थापनांच्या मदतीने सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेतला असून कलम १४४ अंतर्गत नुकताच शहरातील सर्व आस्थापनांना सीसीटीव्ही बसवण्याबाबत पोलिसांनी विनंती केली होती. त्या अंतर्गत दुकानं, ऑफिस, हॉटेल, समारंभाचे सभागृह, धार्मिक स्थळे, रहिवासी सोसायट्या इ. यांना सीसीटीव्ही बसवण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील बहुसंख्य खासगी आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात जवळपास तीन लाख सीसीटीव्हींचे जाळे निर्माण होईल. त्यामुळे शहरातील प्रत्येक कानाकोप-यावर लक्ष ठेवणे शक्य होणार असून त्यामुळे शहरातील गुन्हे कमी होण्यास नक्की मदत होऊ शकते.
हेही वाचाः- पक्ष वाढवायचा असेल तर.., चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला
सध्या मुंबई पोलिसांचे स्वतःचे साडे पाच हजार सीसीटीव्ही आहेत. त्यांच्या सहाय्याने शहरातील विविध हालचालींवर लक्ष ठेवण्यात होते. त्याच्या जोडीला आता मुंबई पोलिसांना सात हजार अतिरिक्त सीसीटीव्ही मिळणार आहेत. या १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही नेटवर्कच्या जोडीला आता खासगी आस्थापनांकडून अडीच लाखांहून अधिक सीसीटीव्ही बनवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा अधिक सक्षमरित्या पोलिसांना करणे शक्य होणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही न बसवणा-या खासगी आस्थापनांमध्ये गुन्हा घडल्यास अशा आस्थापनांवर कलम १८८ अंतर्गत पोलिस कारवाई करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या सर्कुलरनुसार दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला असून तो कालावधी जानेवारी महिन्यात संपत आहे.
हेही वाचाः- मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणं सक्तीचं
आम्हाला कोणावरही जोर जबरदस्ती करायची नाही. पण शहराच्या व स्वतःच्या सुरक्षेसाठी खासगी आस्थापनांनी पुढाकार घेऊन पोलिसांना मदत करावी, असे एका अधिका-याने सांगितले. दिल्लीसारख्या शहरांनी अशा योजना यापूर्वीच राबवण्यास सुरवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात सीसीटीव्हींबाबत कायद्यातही काही बदल होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.