सन १९९१ मधील नालासोपाराच्या वडराई गावातील चांदी तस्करी प्रकरणातील सराईत आरोपीला १५ वर्षानंतर पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. चंद्रकांत अण्णा पाटील (६०) उर्फ चरण पालकर असं या आरोपीचं नाव आहे. मागील कित्येक वर्षांपासून तो बेळगावमध्ये नाव बदलून रहात होता.
नालासोपारा येथील वडराई गावात भाई ठाकूरच्या आदेशाने १९९१ मध्ये चांदीने भरलेले जहाज परदेशातून आले होते. त्यावेळी समुद्रातील खडकाला जहाज धडकल्याने ते जहाज पाण्यात बुडाले. याची माहिती मिळताच वडराई गावातील नागरिकांनी जहाजातील चांदी लुटली. त्याचाच राग म्हणून भाई ठाकूरच्या हस्तकांनी वडराई गावातील नागरिकांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्यावेळी गावातील काही रहिवाशांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. तर काहींना जीवंत पेटवण्यात आलं होतं.
या संघटीत गुन्हेगारीत आरोपी चंद्रकांत पाटीलचाही सहभाग होता. या प्रकरणात पोलिसांनी पाटीलला अटक केल्यानंतर १९९७ मध्ये तो जामिनावर सुटल्यानंतर फरार झाला. त्यानंतर दिल्लीतील सुभाषसिंग टोळीसोबत तो काम करत होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्याला शस्त्रसाठ्यासह दिल्लीत अटक केली. या प्रकरणात टाडा कायद्यांतर्गत न्यायालयाने त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावली.
त्यानंतर नालासोपारा पोलिसांनी चांदी तस्करी प्रकरणात पाटीलचा पुन्हा ताबा घेतला. काही महिन्यांनी पाटील पुन्हा जामिनावर बाहेर आला ताे न्यायालयात हजरच झाला नाही. त्यानंतर पाटील छोटा राजनच्या टोळीसाठी काम करू लागला.
याच दरम्यान नालासोपाऱ्यातील एका जमीन व्यवहारावरून राजनचा विकासक राजेंद्र पतंगे यांच्याशी वाद सुरू होता. हा वाद टोकाला गेल्यानंतर राजनने त्याच्यावर साथीदारांमार्फत गोळीबार करत त्यांची हत्या केली. या प्रकरणातही पाटीलचा सहभाग असल्याने पोलिस त्याचा शोध घेऊ लागले. तेव्हा पाटील आपली खरी ओळख लपवून चरण पालकर या नावाने बेळगावमध्ये स्थायिक झाला.
कालांतराने बेळगावात इस्टेट एजंट म्हणून काम करू लागल्यानंतर नालासोपारा आणि बोरिवलीत कामानिमित्त त्याचं येणं-जाणं वाढलं होतं. याची माहिती गुन्हेशाखा ११ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त निसार तांबोळी दिली.
हेही वाचा-
तेलंगणातल्या आरटीआय कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना अटक