मुंबईतील सोने-चांदीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घेऊन त्या बदल्यात बनावट सोन्याच्या विटा देऊन फसवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अशा प्रकारे या टोळीने तीन व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
कांदिवलीच्या ठाकुर्ली परिसरात राहणारे व्यावसायिक अनिल पामेचा हे घाऊक बाजारात सोन्याची विक्री करतात. आॅर्डर घेऊन ते कुरिअरच्या माध्यमातून आलेल्या सोन्याच्या बदल्यात सोन्याचे दागिने पाठवतात.. नेहमीच्या ओळखीच्या कुरिअरने ते सोने पाठवतात. १ फेब्रुवारीला पामेचा यांना सोलापूरच्या अक्कलकोट येथून एक फोन आला होता. समोरील व्यक्तीने पामेचा यांना विश्वासात घेण्यासाठी त्यांच्या व्हाॅट्सअॅपवर स्वतःच्या प्रकाश ज्वेलर्स या दुकानाचे फोटोही पाठवले. खात्री पटल्यानंतर पामेचा यांनी त्याच्यासोबत बोलण्यास सुरूवात केली. त्यावेळी प्रकाश ज्वेलर्सने पामेचा यांच्याकडून नवीन चैनीचे डिझाईन मागितले. त्यानुसार १२ सोनसाखळ्या आणि ३ ब्रेसलेटची आर्डर प्रकाश ज्वेलर्सकडून देण्यात आली.
दोघांमध्ये २२ कॅरेटचा व्यवहार ठरला होता. ठरल्याप्रमाणे पामेचा यांनी कुरिअरने दागिने पाठवले. त्यानंतर प्रकाश ज्वेलर्सकडून आलेल्या पार्सलमध्ये सोन्याच्या विटा होत्या. मात्र पाहताच क्षणी त्या विटा खोट्या असल्याचं पामेचा यांच्या लक्षात आलं. पामेचा यांनी लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करून या फसवणुकीमागे हात असलेल्या प्रितम भळगट उर्फ ओसवाल याला अटक केली. अशा प्रकारे प्रितमने आतापर्यंत तीन जणांना फसवल्याचं उघड झालंं आहे.
हेही वाचा -
प्रेमी युगलांकडे खंडणी मागणारे अटकेत
फेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला भोवली, ६८ हजारांना घातला गंडा