रात्रीच्या वेळी वाहनांमध्ये झोपलेले चालक, सुरक्षारक्षक तसंच रस्त्यांवर झोपलेल्यांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ५ च्या पोलिसांनी छडा लावला आहे. सुमित उपाध्याय आणि राजेश यादव अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे १६ मोबाईल जप्त केले आहेत.
मुंबईत रात्रीच्या वेळीस फिरणारे टॅक्सीवाले किंवा शेवटची ट्रेन सुटल्यानंतर स्थानकावर थांबणाऱ्या नागरिकांना डोळा लागलो. नेमका याच संधीचा फायदा घेऊन सुमित हा मोठ्या शिताफीने त्यांचे महागडे मोबाईल लंपास करायचा. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या तक्रारींत वाढ झाली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. त्याचदरम्यान कांदिवली पूर्वेकडील परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती यूनिट पाचच्या अधिकाऱ्यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचच्या पथकानं समतानगर येथील लोखंडवाला फाऊंडेशन स्कूलच्या परिसरातून सुमितला ताब्यात घेतलं. सुमितची कसून चौकशी केल्यानंतर त्यानं आतापर्यंत केलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबूली दिली. तसंच चोरलेले मोबाइल राजेशला विकत असल्याचेही सांगितल्यानंतर राजेश आयता पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी राजेशलाही अटक केली. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
सचिन सावंत यांच्या हत्येतील आरोपीला आठ वर्षानंतर अटक
पालकांचा जीव टांगणीला, अन् 'त्या' ५ जणी करत होत्या 'मुंबई दर्शन'